वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सव्वाचार हजार अतिक्रमणांवर कारवाई
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून पुणे शहरासह परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या अनुषंगाने संयुक्तरित्या अतिक्रमणे काढण्यात येत आहे. या कारवाईचे दोन टप्पे पुर्ण झाले असून तिसऱ्या टप्यातील कारवाईत २६ मार्चपर्यंत सव्वाचार हजार अतिक्रमणे पाडण्यात आली आहेत.
संयुक्तरित्या सुरु असलेल्या या कारवाईत पीएमआरडीएसह पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलीस, पीएमसी, पीसीएमसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, एमआयडीसी, एसएसईबी आदी विभागांमार्फत अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे यादरम्यान आतापर्यंत अनेक स्थानिकांनी स्वत:हून आपली अतिक्रमणे काढून घेतली आहे. सध्या तिसऱ्या टप्यात पुणे-सातारा रोड (नवले ब्रिज ते सारोळे), हडपसर (शेवाळवाडी) ते दिवे घाट, नवलाख उंब्रे ते चाकण, हिंजवडी परिसर - माण या रस्त्यासह महामार्गांवर कारवाई प्रगतीपथावर आहे. यात १७ ते २६ मार्चपर्यंत ७५० अतिक्रमण व अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे. यात महामार्गासह राज्यमार्ग रस्त्यालगत असणाऱ्या दुकाने, पत्राशेड, गाळे, टपरी व अनधिकृत बांधकामे काढण्यात आली आहेत. चालू टप्प्यामध्ये पूर्वीचे पुणे नगर रस्त्यावरील शिक्रापूर ते शिरूर तसेच बावधन बु. ते एनडीए रोड येथील बकाजी कॉर्नर ते स्मशानभूमी या ठिकाणी संयुक्त कारवाई शुक्रवारपासून (दि. २८) करण्यात येणार आहे. संबंधित रस्त्यांवरील अतिक्रमणधारकांनी स्वत: अतिक्रमणे काढून घेत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे. यासह कोणतेही बांधकाम पूर्वपरवानगी घेऊनच करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
संबंधित कारवाई पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सह-आयुक्त डॉ. दिप्ती सुर्यवंशी-पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, वाहतुक विभागाचे उपआयुक्त बापू बांगर, कार्यकारी अभियंता शैलजा पाटील, कार्यकारी अभियंता सदानंद लिटके, तहसीलदार रविंद्र रांजणे, सचिन मस्के, पोलीस निरीक्षक महेशकुमार सरतापे आदी यंत्रणेच्या संयुक्तरित्या कारवाई करण्यात येत आहे.