संग्रहित छायाचित्र
खासगी अथवा सरकारी नोकरीत असणाऱ्यांनी त्यांचे रिक्षा परमिट ३१ जानेवारीपर्यंत जमा करावे लागणार आहे. नोकरी असताना रिक्षा परवाना असणाऱ्यांवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, त्याची माहिती आरटीओच्या माध्यमातून गोळा करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये नोकरीला असलेल्या अनेकांकडे रिक्षा परवाना (परमिट) असल्याचे दिसून आले आहे.
शहराची लोकसंख्या ३५ लाखांच्या पुढे आहे. नागरिकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन विभागाकडून खासगी वाहतुकीसाठी रिक्षाला परमिट दिले जाते. मोटार वाहन कायद्यानुसार हे परवाने दिले जातात. लोकसंख्या वाढल्यामुळे त्या प्रमाणात रिक्षा कमी असल्याचे लक्षात आल्यानंतर आरटीओकडून नवीन रिक्षांना परवाने देण्यास २०१७ मध्ये सुरुवात करण्यात आली होती. रिक्षा परवाने देण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेकांना व्यवसाय मिळाला. अनेकांनी रिक्षा घेऊन परवाने घेतले. त्यामुळे रिक्षांमध्येदेखील स्पर्धा निर्माण झाली.
त्यात अनेक ठिकाणी महिलांनादेखील रिक्षा परवाने देण्यात आलेले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये ४० हजारहून अधिक रिक्षा परवाने दिले आहेत. शहरात रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात झाली आहे. मोटार वाहन कायद्यानुसार ऑटोरिक्षा परवाना देताना संबंधित व्यक्ती सरकारी, निमसरकारी, खासगी कंपनीत किंवा इतर कोणत्याही संस्थेत नोकरी करत नसल्याची अट आहे. रिक्षा परवाना देण्यासाठी संबंधित व्यक्तीकडून याबाबत प्रतिज्ञापत्र घेण्यात येते. तरीही शहरात काहीजण नोकरी करून शिल्लक वेळेत रिक्षा चालवित असल्याच्या तक्रारी येत आहेत. रिक्षा परवाना घेतल्यानंतर नोकरी मिळाल्यास त्या व्यक्तींनी त्यांचा रिक्षा परवाना स्वेच्छेने परत करणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींनी येत्या ३१ जानेवारीपर्यंत रिक्षा परवाना परत करावा. त्यानंतर आरटीओकडून कारवाई केली जाणार आहे.
आरटीओ विभागाने जिल्ह्यासाठी आदेश जारी केला आहे. यात खासगी, सरकारी, निमसरकारी, खासगी कंपनीत किवा इतर कोणत्याही संस्थेत नोकरी करत असतील त्यांनी ३१ जानेवारीपर्यंत रिक्षा परवाना प्रादेशिक परिवहन विभागाकडे जमा करायचा असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले.