५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवण्याची राहुल गांधींची मोठी घोषणा
पुणे: भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. तर कधी आरक्षण संपून टाकण्याचे सांगत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवणार की नाही हे सांगावे, असे आवाहन कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी मोदींना दिले. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर तर देशात आरक्षणाची असलेली ५० टक्के मर्यादा हटवू, अशी मोठी घोषणा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शुक्रवारी पुण्यात केली.
पुणे शहर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत राहुल गांधी बोलत होते. राहुल गांधी म्हणाले की, देशात १५ टक्के दलीत, ८ टक्के आदिवासी आणि ५० टक्के वंचित समाज आहे. देशातील गरीब, दलीत, आदिवासी जनतेला संविधानाने अधिकार दिले. संविधान राहिले नाही तर काहीही राहणार नाही. ज्या दिवशी भाजप संविधान संपवेल त्यादिवशी देशाची ओळख पुसली जाईल. आंबेडकर, महात्मा गांधी यांनी दिलेले संविधान आम्ही संपवू देणार नाही. असा ठाम विश्वास राहुल गांधी यांनी वेळी व्यक्त केला.
मीडिया गरिबांचे प्रश्न दाखवीत नाही. मात्र, अंबानींच्या घरातील लग्न दाखवीत आहे. अदानी यांच्या ताब्यात बहुतांश मीडिया आहे. एल्क्ट्रोराल बाँडचा हजारो कोटींचा घोटाळा होत आहे. यावर येथील मीडिया बोलत नाही. या शब्दात राहुल गांधी यांनी मीडियावर निशाणा साधला.
भाजपचे सरकार हे अदानीसह बावीस लोकांसाठीच काम करीत आहे. त्यांचे सुमारे सोळा लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. या पैशातून शेतकऱ्यांचे पुढील चोवीस वर्षाचे कर्ज माफ करता आले असते असा दावा गांधी यांनी यावेळी केला. पंतप्रधान शेतकरी, मजुर, बेरोजगारी याविषयावर चर्चा करीत नाही. भ्रष्टाचार मुक्त भारत करणार असे म्हणणारे पंतप्रधान मोदी यांनी देशासमोरच निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. निवडणूक रोख्यांना सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरविले आहे. भाजप देणगीदारांचे नाव का जाहीर करीत नाही ? हजारो कोटी रुपयांचे काम मिळालेल्या कंपनीने त्यांना देणगी दिली. सीबीआय चौकशी लावल्यानंतर एका कंपनीने हजारो कोटी दिले असाही गंभीर आरोप गांधी यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले..
- आमचे सरकार आल्यावर आम्ही जातीय जनगणना करणार
- कुठल्या संस्थेमध्ये किती टक्के लोक हे यातून समोर येईल, हे एक क्रांतिकारी पाऊल असेल.
- सत्ताधारी देशातील जनतेला वेड्यात काढले जात आहे. जातीय जनगणनेचे विषय काढल्यावर नरेंद्र मोदी ओबीसी असल्याचे सांगत आहेत. देशात गरीब आणि श्रीमंत दोनच जाती असल्याचे ते सांगतात.
- खासगीकरण करण्याचे मागे मोदी लागले आहेत. रेल्वेत खासगीकरण सुरू झाले आहे. बुलेट ट्रेन हा बहाणा आहे. अग्निवीर योजना आणली ती आम्ही बंद करणार
- जीएसटीमध्ये बदलवून टाकणार, कोणतेही पाच टॅक्स असणार नाहीत तर एकच टॅक्स असेल.
- देशात पहिल्यांदाच शेतकऱ्यांकडून कर घेतला जात आहे.
- देशातील गरीब परिवाराची आम्ही यादी बनविणार, या परिवारातील एका महिलेच्या खात्यात एक लाख रुपये वर्षाला टाकणार आहोत.
- मनरेगामुळे गरीब आळशी बनेल असे म्हणतात. दुसरीकडे अडणीचे करोडो रुपये कर्ज माफ करतात.
- जी कंपनी कोरोना लस बनवीत होती. तीच कंपनी बाँडद्वारे नरेंद्र मोदींच्या पक्षाला पैसे देत होती.
- पहिली नोकरी पक्की ही आमची गॅरंटी
- देशातील कुणीही पदवीधर सरकारकडे नोकरी मागू शकतो. त्याला सरकार अडवू शकत नाही.
- ग्रॅज्युएशन असलेल्यांना एक लाख रुपये मिळणार, यातून कुशल मनुष्यबळ निर्माण करणार.
- शरद पवार यांच्यासारखे वरिष्ठ नेत्यांच्या अपमान करत केला जात आहे.
- राज्यात पेपरफूटी होते. बेइमानी करून काहीजण पास होतात. यावर आम्ही नवीन कायदा अणू. यातून पेपर फोडणाऱ्यांना कडक शिक्षा होणार.
- सत्ताधारी पाच टक्क्यांचे सरकार चालवत आहेत. आम्ही ९० टक्क्यांचे सरकार चालवणार.
- जी कंपनी कोरोना लस बनवीत होती. तीच कंपनी बाँडद्वारे नरेंद्र मोदींच्या पक्षाला पैसे देत होती.